लेखक प्रमोद वाघमारे
हॅालमध्ये पाच जणी उभ्या आहेत. गौरी, दिव्या, मेघना, स्वाती, शिल्पा या क्रमाने. मी आरामात खुर्चीत बसलोय.
(दोन पावलं पुढे येत) गौरीः बाबा, मी खेळायला जाऊ?
मीः नको. जा कपडे आवर.
गौरीः पण दादा तर खेळतोय ना… (गौरी नाराज होत दोन पावलं मागे हटते)
(दोन पावलं पुढे येत) दिव्याः बाबा, मी स्कुल ट्रीपला महाबळेश्वरला जाऊ का?
मीः नको. तिथे थंडी असते.
दिव्याः पण दादा तर जातोय ट्रीपला… (दिव्या नाराज होत दोन पावलं मागे हटते)
(दोन पावलं पुढे येत) मेघनाः मी मुंबईला पुढचं शिक्षण घेऊ?
मीः कशाला? तुझं लग्न ठरवतोय आम्ही.
मेघनाः पण मला खुप शिकायचंय… ( मेघना नाराज होत दोन पावलं मागे हटते)
(दोन पावलं पुढे येत) स्वातीः अहो, मी नोकरी करू का?
मीः नको. मग घर कोण सांभाळणार?
स्वातीः पण मला पण मोठं व्हायचंय… (स्वाती नाराज होत दोन पावलं मागे हटते)
(दोन पावलं पुढे येत) शिल्पाः अहो, आपण कुठे महिनाभर फिरून येऊ का?
मीः नको. मग नातवंडांना कोण सांभाळणार?
(प्रेक्षकांकडे बघत) शिल्पाः बहिण, मुलगी, पत्नी, आई, आजीची कर्तव्ये पार पाडता पाडता, मी कुठे हरवून गेले? काय माहित?
(निराशेचे जमिनीकडे बघते)
#pramodwaghmare #actingbypramod
(C) Pramod Waghmare